
काळाच्या पुढे जाण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन कामाचा आराखडा तयार करणे, आपल्याबरोबर समाजाला नवी दिशा देत, तंत्रकुशल नेतृत्व म्हणून स्वत:ला सिध्द करत, ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर.
सर्वधर्मसमभाव ,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला. माणकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान व दूरदर्शी गृहस्थ होते.अठराव्या शतकामध्ये आजच्या सारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्येला शिक्षणाची घरीच व्यवस्था केली. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.
मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.
प्रारंभीचा काळ -
लग्नानंतर लगेच आपल्या चतुर ,क्षमाशील व शांत स्वभावाने अहिल्यादेवींनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली. त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे,वाचणे, गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या.तसेच घोड्यावर बसणे,दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे,लढाया करणे,पत्रव्यवहार करणे न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले. परिणामी अहिल्येची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातली आध्यात्मिकता, मराठी मुलखाचा नेकीचा वारसा, त्यांच्या पूर्वसूरी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रभाव, समकालीन पेशवेशाहीचे शासनव्यवस्थेचे मापदंड यांना द्यावे लागेल. पेशवे ज्या मराठेशाहीचे वारसदार, त्याच्या अध्वर्यू राजांच्या-शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे प्रतिबिंब अहिल्याबाईंच्या प्रशासन पद्धतीत पाहायला मिळते.
महाराज श्रीमंत योगी होते, त्यांचा वारसा अहिल्याबाईंनी खंबीर नेतृत्व करत पुढे चालवला.
सामाजिक कार्य -
त्यांच्या तीस वर्षांच्या शासनकाळात अहिल्याबाईंनी सतत आर्थिक कार्य व राज्याच्या, जनतेच्या आर्थिक उन्नतीचे सतत प्रयास केले. त्यात सातत्य राहील याचा व शाश्वततेचा विचारही केला. हे प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सर्वसमावेशी (inclusive) आणि सर्वधर्मसमभावाचा विचार करणारे होते हे अजून एक वैशिष्ट्य. त्यांनी अमलात आणलेला ‘अर्थविचार’ त्यांच्या आदर्श व सर्व स्तरावरील समाजाचा उध्दार करणाऱ्या दृष्टिकोनाचा द्योतक आहे, म्हणून महत्त्वपूर्ण आहे व वैशिष्ट्यपूर्णही आहे.
विकासाची कामे -
पेशव्यांचा विरोध झुगारुन त्यांनी आपले राज्य उभे केले. त्यांनी आपल्या आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे. संपूर्ण भारतात अनेक विहिरी ,तलाव ,कुंड, घाट बांधले आहेत. देशाचा विकास व्हायचा असेल तर पायाभुत सुविधा विकसित करणे गरजेचे असते हे ओळखून त्यांनी रस्ते,पूल निर्माण केले आहेत. उद्योगधंद्यांची सुरुनात करणे आणि त्याच्या विकासाला प्राधान्य दिले. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदोर वरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर ,मजूर, विणकर, कलावंत ,साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा, घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या. आजही महेश्वरी साड्या, पैठणी, धोतर प्रसिद्ध आहेत. राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी कुरणे राखली. अहिल्याबाईंनी युद्ध किंवा लढाईचे समर्थन केले नाही;परंतु युद्धमोहिमा होतातच. युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या पत्नी व परिवारांच्या चरितार्थासाठी त्यांना विणकरीचे प्रशिक्षण दिले. त्यासाठी बनारसी विणकरांना
बोलावले आणि महेश्वरला वस्त्र उत्पादन सुरू केले, त्यातून‘माहेश्वरी’ हा ब्रँड बनला.
मुंग्यांना साखर, माश्यांना कणकेचा गोळा, उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पाणपोया, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली. आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली. दिव्यांग, अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालविली. वस्त्रांचे वाटप केले. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आंबराई, बगीचे ,वृक्षारोपण विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या. घाट बांधतांना केवळ तज्ञांची मत विचारात न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात, कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल, कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात? इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले.
तिर्थक्षेत्रांचा विकास -
अहिल्याबाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर,मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचाजीर्णोद्धार केला.
वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.
शेती व्यवस्थापन -
भारतात आर्थिक व्यवस्था नेहमी शेतीप्रधान राहिलेली आहे. शेती हाच समाजाच्या चरितार्थाचे साधन व संस्कृतीचा आधारस्तंभसुद्धा आहे. आजच्या काळात आधुनिक कृषी कायद्यांच्या अंतर्गत शेतमाल कुठेही विकायला परवानगी मिळावी, अशी मागणी केली जाते.ती सुविधा अहिल्याबाईंनी 18 व्या शतकात लोकांना दिली होती. त्यांच्या काळात शेती लाभदायक होण्याचे एक महत्त्वाचे कारण होते त्यांचे पाणी व्यवस्थापन. खासगी उपयोगासाठी प्रदूषणमुक्त पाण्याचे स्रोत, वेगळे
प्रवाह आणि शेतीच्या उपयोगासाठी वेगळे स्रोत हे नियोजन लाभदायक ठरले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या दुरदृष्टीतून उभी राहिलेली सामाजिक व्यवस्था अनेक दशकानंतर आजही आपल्या सर्वांना आनंद देते आहे.